महाराष्ट्र
२७ गावातील अंधारात असलेले रस्ते येणार उजेडात
पथदिव्यांसाठी २७.९० कोटी मंजूर
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात असलेल्या २७ गावातील रस्त्याच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम देखील सुरु आहेत. मात्र रस्त्यांवर रात्री अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला पथदिवे बसविण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्यानंतर तातडीने शासनाच्या नगर विकास विभागाकडून २७.९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने २७ गावातील अंधारात असलेले रस्ते लवकरच उजेडात येणार आहेत.
या पथदिव्यांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या कडेला पथदिवे बनवण्यासाठी नगरविकास खात्याने निधीची उपलब्धता करून दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्त्यावर अंधार असल्याने नागरिकांकडून पथदिवे बसविण्याची मागणी झाली होती. यानुसार स्थानिक आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे २७ गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. परंतु महानगरपालिकेकडे निधी नसल्यामुळे त्यांची अडचण झाली होती. यानंतर आमदार राजू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता.
नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांना विनंती केली होती. त्यानंतर हा २७. ९० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. गेली अनेक वर्ष अंधारात असलेल्या या गावांमध्ये दिवाबत्तीची व्यवस्था आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे २७ गावातील रस्ते आता प्रकाशझोतात येणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याने नागरिकांकडून देखील आनंद व्यक्त आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600