जिल्हा
चिमुकल्यासाठी खाकी वर्दीतील विठ्ठल आला धावून
चिमुकल्यासाठी खाकी वर्दीतील विठ्ठल आला धावून
फोटो: ठाणे वैभव
* जीवदान देणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचे कौतुक
* गणेशनगरातील ८५ नागरिकांची सुखरूप सुटका
कल्याण : मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असताना पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दाखवलेले धाडस पाहून नागरिकांना साक्षात खाकीतील विठ्ठलच भेटल्याची भावना व्यक्त होत आहे.
खडवली पडघा परिसरातील गणेशनगरमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबे अडकून पडली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. कंबरभर पाण्यातून मार्ग काढत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात केली. या धाडसी मोहिमेत तब्बल ८५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान जोशना साळुंखे (६०), देविका पवार (४), अश्विनी पवार (२५) आणि संतोष पवार (२८) हे पुराच्या पाण्यात अडकले होते. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांची सुखरूप सुटका केली. विशेष म्हणजे, एका चिमुकल्याला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून वाटचाल करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचे दृश्य अनेकांच्या मनाला भिडले. त्या क्षणी नागरिकांना खाकी वर्दीतील अधिकारी नव्हे, तर लेकरांचे रक्षण करणारा 'विठूराया' दिसला.
संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना धीर देणे आणि सुरक्षिततेचा आधार बनणे, हाच खऱ्या अर्थाने पोलीस सेवेचा धर्म आहे. पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी केवळ पार पाडली नाही, तर माणुसकीचे सर्वोच्च उदाहरणही घालून दिले. पूराचे पाणी एक दिवस ओसरेल, पावसाळा संपेल; मात्र पुराच्या पाण्यात चिमुकल्याला खांद्यावर घेऊन जीवदान देणारा 'खाकीतील विठ्ठल' हा प्रसंग नागरिकांच्या स्मरणात कायम राहील.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600