जिल्हा
अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या वाहनाला अपघात
अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या वाहनाला अपघात
फोटो: ठाणे वैभव
पाच जण दगावले तर दोघे बचावले
भाईंदर: रत्नागिरीतील देवरुख तालुक्यातील कार्ली गावात एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे गावातील जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला, जिथे वेगाने येणारी कार पुलाच्या रेलिंगला धडकली आणि खाली पडली. मृतांमध्ये मिरारोड येथील तीन जण तर नालासोपारा येथील दोघांचा समावेश आहे.
मिरा रोड येथाल इंद्रप्रस्थ बिल्डिंग, पूनम विहार कॉम्प्लेक्स, अय्यप्पा मंदिराच्या पाठीमागे विवेक श्रीराम मोरे (४७) हे राहतात. विवेक मोरे यांचे सासरे मोहन चाळके (रा. कर्ली देवरुख, तालुका देवरुख, जिल्हा रत्नागिरी) हे मृत झाल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मिरा रोड येथून जात होते. परमेश पराडकर यांची सात सीटर चारचाकी गाडी होती. परमेश व मेघा पराडकर हे नालासोपारा येथे राहतात. ते नालासोपारा येथून कार घेऊन मिरा रोड येथे मोरे कुटुंबाला घेण्यासाठी आलेहोते. हे सर्व सात जण रत्नागिरीला चालले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलाच्या कठड्याला
धडक देऊन गाडी पुलावरून खाली पडून अपघात झाला. या अपघातात विवेक मोरे हे किरकोळ जखमी व चालक परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले.
अपघातातून वाचलेले विवेक मोरे एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांचा १९ वर्षांचा मुलगा निहार पदवीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. या अपघातात विवेकला किरकोळ दुखापत झाली. चालक परमेश पराडकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये विवेकची पत्नी मिताली मोरे, त्याचा मुलगा निहार आणि मेहुण्याचा मुलगा श्रेयस सावंत यांचा समावेश आहे. श्रेयस एका बँकिंग फर्ममध्ये काम करत होता. याशिवाय ड्रायव्हर परमेशची पत्नी मेघा आणि त्याचा मुलगा सौरव यांचाही मृत्यू झाला. परमेशचा पर्यटन व्यवसाय आहे आणि गाडीही त्याचीच होती. शनिवारी रात्री ११ ते १ च्या दरम्यान तो सर्वांसह रत्नागिरीला रवाना झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन पूर्ण झाले होते आणि मृतांना अंत्यसंस्कारासाठी मीरा रोड आणि नालासोपारा येथे आणले. मिळालेल्या माहितीनुसार, परमेश गाडी चालवत होता आणि विवेक त्याच्या शेजारी बसला होता. अपघाताच्या वेळी दोघांनीही सीट बेल्ट लावले होते, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापतींपासून वाचवले गेले. त्याचा जीव वाचवण्यात सीट बेल्टने महत्त्वाची भूमिका बजावली.
मिताली मोरे (मिरा रोड), श्रेयस सावंत (मिरा रोड), निहार मोरे (मिरा रोड), सौरव पराडकर (नालासोपारा), मेघा पराडकर (नालासोपारा) अशी मृतांची नावे आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600