जिल्हा
फेरीवाल्यांवर केली कारवाई; विटाव्यात बांधकामांची लगीनघाई
ठाणे: कळवा प्रभाग समितीतील विटावा भागात भर पावसात बेकायदेशीरपणे इमारतींचे स्लॅब पडत असून फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांना ही बांधकामे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खाडी बुजवून चाळी, इमारती उभ्या राहिल्याने विटाव्याने आधीच मान टाकली असताना आता भर पावसात सुरू झालेली बांधकामे भल्या भल्या वास्तू विशारद आणि अभियंत्यांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडू लागली आहेत. याचे सारे श्रेय कळवा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना जाते, अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून मिळत आहेत.
पावसाळ्यापूर्वी या भागात सुरू असलेल्या इमारतींना प्रभाग समितीकडून अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळाल्याने नजर टाकू तिथे इमारत दिसू लागली आहे. याबाबत झालेल्या अनेक तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सध्या गणपती विसर्जन घाट, सूर्य नगर येथे बालाजी वडापाव दुकानाजवळ आणि मनोज स्मृतिजवळ अनधिकृतपणे स्लॅब पडले आहेत. युरोप टूरवरून परतल्यानंतर सहायक आयुक्त ठाणेकर यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली, पण या बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
विटाव्यातील या भूमाफियांकडून अधिकाऱ्यांना विविध माध्यमातून बक्षिसी मिळत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाल्याने विटाव्याची दुर्दशा थांबवणे देवालाही आता शक्य नसल्याचे येथील जागरूक नागरिक बोलत आहेत.
दूरदृष्टी असलेल्या नवीन आयुक्तांनी आपला मोर्चा विटाव्याकडे वळवावा, येथील अधिकाऱ्यांना केवळ नोटिसा न बजावता त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600