जिल्हा
आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीचा आरोप
आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीचा आरोप
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई महापालिकेची चौकशी सुरू
नवी मुंबई: आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बेकायदेशीरपणे विविध शुल्क आकारून प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा गंभीर आरोप घणसोली येथील न्यू बॉम्बे सिटी स्कूल या शाळेवर करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले असून संबंधित शुल्क परत करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी २० मे २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून घणसोली केंद्र प्रमुख अर्चना म्हात्रे यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेमार्फत “ऍक्टिव्हिटी फी ”, “स्कूल ऍक्टिव्हिटी चार्जेस ” आदी नावाखाली वार्षिक सुमारे १३,६०० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात समाजसेवक दिनेश म्हात्रे यांनी ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत शिक्षण विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, प्रचलित शासन निर्णयानुसार आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येत नाही. त्यामुळे संबंधित शाळेला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या पालकांकडून “ऍक्टिव्हिटी फी ” किंवा अन्य कोणत्याही नावाने शुल्क आकारण्यात आले असेल आणि त्यात अनियमितता आढळल्यास संबंधित पालकांना फी परत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर आणि स्वयंस्पष्ट अहवाल सात दिवसांच्या आत शिक्षण विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.