न्यूजलेटर्स
'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात
वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
नवी दिल्ली: देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आगामी 21 जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सरकारने थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाची मदत घेतली जाणार आहे.
नीटच्या फेरपरीक्षेच्या नियोजनासंदर्भात आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. परीक्षेतील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. या बैठकीत नीट परीक्षा अधिक पारदर्शक आणि 'फुलप्रूफ' करण्याबाबत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा केल्या जाणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. पेपर लीकचा कोणताही मार्ग उरणार नाही, अशा प्रकारे तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाईल. पेपर वाहतुकीदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीच वायूदलाच्या विशेष विमानांची मदत घेतली जाणार आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारींनंतर आता खुद्द गृह आणि संरक्षण यंत्रणा या परीक्षेत लक्ष घालत आहेत. लष्कर आणि वायूदलाच्या थेट सहभागामुळे परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. आता 21 जूनच्या फेरपरीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे.