जिल्हा
उष्मा वाढल्याने भाज्यांची आवक वाढली; दर उतरले!
नवी मुंबई: राज्यात मागील आठवड्यात गारठा तर आता ढगाळ वातावरण व उष्मा वाढल्याने वातावरणातील उष्म्याने आठ दिवस आधीच उत्पादन निघाल्याने बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे, त्यामुळे काही भाज्यांचे दर उतरले आहेत तर काही भाज्या मात्र महागच आहेत.
गुरुवारी वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण ७०० गाड्या दाखल झाल्या होत्या. यामध्ये पालेभाज्याच्या २०० गाड्या आवक झाली आहे. एरव्ही बाजारात ५५०-६०० गाड्या दाखल होतात. मागील आठवड्यात गारठा वाढला होता,परंतु पुन्हा आता ढगाळ वातावरण आणि उष्मा वाढला आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन लवकर निघत आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. काही भाज्यांच्या दरात प्रतिकिलो ५-६ रुपयांची घसरण झाली आहे, मात्र बहुतांश भाज्यांचे दर चढेच आहेत.
घाऊकमध्ये प्रतिकिलो टोमॅटो ४० रुपये, शिमला मिरची ४० रुपये, हिरवी मिरची २०-३० रुपये, कोबी १६-२० रुपये, फ्लॉवर १० रुपये, भेंडी ४०-५० रुपये, फरसबी ४० रुपयांनी विक्री होत आहे.ल, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
वाशीतील एपीएमसी भाजीपाला बाजारात पालेभाज्या आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे. उष्म वातावरणाने उत्पादन जास्त निघत आहे, त्यामुळे अधिक प्रमाणात भाज्या दाखल होत असून जुडी ५-७ रुपयांनी विक्री होत आहेत. पुणे आणि नाशिक येथून येणाऱ्या मेथीला कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. याआधी १५-२० रुपये दराने एक जुडी मिळत होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरी, पालक आणि मेथीची आवक वाढत असून कोथिंबीर प्रतिजुडी ५-८ रुपयांनी उपलब्ध आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600