जिल्हा
ठाण्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ५२९ दात्यांचे रक्तदान
ठाण्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ५२९ दात्यांचे रक्तदान
फोटो: ठाणे वैभव
ठाणेः रक्तानंद ग्रुप महाराष्ट्रच्या वतीने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आयोजित केले जाणारे रक्तदान शिबिर आज संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखले जाते. आनंद दिघे यांनी ३१ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. यावर्षीच्या शिबिरात एकूण ५२९ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
३१ डिसेंबरच्या रात्री तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली न जाता समाजहितासाठी पुढे यावी, या उद्देशाने आनंद दिघे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वारसा पुढे नेला आहे. या शिबिराच्या माध्यमातून स्व. आनंद दिघे यांच्या अस्तित्वाची आणि संस्कारांची जाणीव होते, असे मत आयोजक शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार यांनी व्यक्त केले.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ७२, ५६ आणि ४८ वेळा रक्तदान करणाऱ्या ज्येष्ठ रक्तदात्यांना 'रक्तकर्ण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तसेच ठाणे शहरातील तीन सेवाभावी डॉक्टरांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या शिबिरासाठी नाशिक, पुणे, मुरबाड, जव्हार, शहापूर यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते उपस्थित होते.
या शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रक्तदान करून तरुणांना प्रोत्साहित केले. या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, सचिव विलास जोशी आदींनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला तसेच सुधीर कोकाटे, पवन कदम, संजय भोईर, राजेश मोरे, अनिल भोर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी दिल्या. ही परंपरा अविरत चालू ठेवण्याचा मानस आयोजक हेमंत पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600