महाराष्ट्र
पार्सल घेण्यासाठी आला, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या टोळीकडून ७५ किलो गांजा आणि ४८ हजार कोडिन बॉटल अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागवले होते.
उल्हासनगरमधील एका कुरिअरच्या कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कुरियरद्वारे मागवलेले अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती आला. तो पार्सल घेण्यासाठी आला आणि त्याने पार्सल हातात घेतलं. त्या व्यक्तीने ते पार्सल हातात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याने चौकशीत टोळीतील इतरांची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनंतर इतर पाच जणांना भिवंडीतील एका चौकामध्ये कारमध्ये बसलेले असताना त्यांच्या मुसक्या आवळत पकडले आहे. त्यांच्याजवळ १ लाख १८ हजार ८८० रुपये रोख रक्कम आढळली आहे.
मनीष पी, आकाश पी, राज के, मोहनीश एस आणि सनी जे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्याच्या वाहनांची झडती घेतली गेली. वाहनांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे ट्रॅव्हल्स बॅग, ट्रॉली बॅग असा एकूण पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान यांना कोण कुरिअर करत होतं, यांचा मोरक्या कोण आहे, कोणाला हे अमली पदार्थ विकायचे? यांचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएसने भिवंडीमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. भिवंडीतील एका फ्लॅटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी ७९२ किलो आणि ८०० कोटींचं एमडी ड्रग्ज ताब्यात घेतले होते. सुरतमध्ये छापेमारी करत असताना पोलिसांना भिवंडीतील ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर भिवंडीतील फ्लॅटवर छापा टाकत ड्रग्जसह दोघांना ताब्यात घेतलं होतं.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600