जिल्हा
प्रेमी युगुलांचे चाळे; सुरक्षा रक्षकांचे डोळे
उपवन तलावाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवणार
ठाणे: प्रेमी युगुलांचा नेहमीच गराडा असलेल्या उपवन तलावाभोवती आता प्रेमी युगुलांना चाळे करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेनेच पुढाकार घेतला असून यासाठी आता या परिसरात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उपवन तलाव पर्यटक आणि प्रेमी युगुलांचा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यामुळे दिवस असो वा रात्र, नेहमीच प्रेमीयुगुलांचा गराडा या तलावाभोवती पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी काही प्रेमी युगुलांकडून प्रेमाचे चाळे या ठिकाणी खुलेआम सुरु असतात. त्यामुळे या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना ही सर्व दृश्ये समोरच दिसत असतात. तलावाभोवती फक्त बसायला काहीच हरकत नाही मात्र या ठिकाणी होणाऱ्या प्रेमाच्या चाळ्यांवर नागरिकांनी आक्षेप घेतला असून आता महापालिकेने देखील या सर्व गोष्टींना मज्जाव करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. या ठिकाणी आहे त्यापेक्षा अधिक सुरक्षा वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असून या ठिकाणी हे सर्व चाळे कसे होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600