जिल्हा
ठामपा निवडणुकीत ३४० उमेदवारांची अनामत जप्त
महापालिकेच्या तिजोरीत १२ लाखांची भर
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३४० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १२ लाखांची भर पडली आहे. तर विजयी उमेदवारांची रक्कम परत दिली जात आहे.
या निवडणुकीत १३१ जागांसाठी ६४८जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सर्वसाधारण उमदेवाराला पाच हजार तर महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना अडीच हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागली होती.
महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात झाली होती. या निवडणुकीत १३१ उमेदवार विजयी झाले होते तर तर १७७ उमेदवार आपली अमानत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले होते. प्रभाग क्र.१८मध्ये तीन जण बिनविरोध निवडून आले होते. एका जागेकरिता निवडणूक झाली होती. या प्रभागातील एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही. ज्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली नाही अशा निवडून आलेल्या १३१ नगरसेवकांना महापालिकेकडून चार लाख ७७ हजार पाचशे रुपये इतकी रक्कम परत दिली जाणार आहे. जे उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आले होते अशा १७७ उमेदवारांना सुमारे सहा लाख अशी एकूण ११ लाखांची रक्कम परत दिली जाणार आहे. महापालिकेच्या तिजोरीत सुमारे बारा लाखांची रक्कम राहणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांना देखिल नोटीस पाठवली जाणार असून राजकीय पक्षाच्या उमेदवारानी हिशोब दिला असला तरी अपक्ष उमेदवारांनी अजूनही हिशोब दिला नाही, त्यांना नोटीस पाठवली जाणार असून त्यांनी त्यानंतर देखिल हिशोब दिला नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ठाणेवैभव'ला सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600