जिल्हा
कोपरीत १०० विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप
ठाणे : भाजपा कोपरी मंडल व तारामाऊली सेवा संस्थेच्या वतीने कोपरीतील १०० विधवा भगिनींना शिलाई मशिन मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे राहण्यासाठी आधार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या माध्यमातून १०० विधवांबरोबरच आणखी २०० जणांना विद्यावेतन व स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज लाभार्थींना शिलाई मशिन व धनादेशाचे वाटप करण्यात आले.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व कोपरी मंडल अध्यक्ष भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी कोपरी येथील आनंद बॅंक्वेट सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबरोबरच आमदार निरंजन डावखरे, समाजसेविका भावना चव्हाण, डॉ. सोनल चव्हाण-झवर, महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, अशोक पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमातच भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.
केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून, १०० विधवा भगिनींना मोफत शिलाई मशीनबरोबरच कोपरीतील १०० विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन आणि स्वयंरोजगार करणाऱ्या मागासवर्गीय समाजातील १०० तरुणांना ५०० रुपये मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. या कार्यक्रमात संबंधितांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
देशातील प्रत्येक कुटुंब आनंदी राहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. कोरोनाकाळापासून मोफत धान्य, मोफत उपचारासाठी आयुष्मान भारत योजना, स्वच्छतागृह योजना आदींसारख्या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील बांधवांची काळजी घेतली जात आहे. विधवा भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे राहण्यासाठी आधार दिला जात आहे. मुलांचे शिक्षण व आरोग्याची चिंता केंद्र सरकारकडून केली जात आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची गरज बनले आहेत, असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले.
या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनीही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन कुटुंबांचा विकास करण्याचे आवाहन केले.केंद्र व राज्य सरकारच्या योजना कोपरीत प्रत्येक घरापर्यंत पोचवित आहोत, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. तर तारामाऊली संस्थेचे संस्थापक व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी कोपरी परिसरातील ६० हजार महिला भगिनींना सरकारी योजनांचा फायदा देऊन त्यांचे जीवनमान बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छ भारत योजनेतून एक हजार घरांमध्ये शौचालये उभारली गेली. यापुढील काळातही सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून कार्य करणार आहोत, असे ओमकार चव्हाण सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600