जिल्हा
मुंब्र्यात सज्जा कोसळून मुलीचा मृत्यू
मुंब्र्यात सज्जा कोसळून मुलीचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
'त्या' कुटुंबाला दहा लाखांचे अर्थसाह्य द्या-शानू पठाण
ठाणे: मुंब्रा येथे एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना दहा लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली.
मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमधील नागरिकांना वाचविण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पठाण यांनी कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावर चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरविले. तसेच, जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल केले. आज या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावर टीका केली.
विरोधी पक्ष नेते शानू पठाण म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरांमध्ये सुमारे ४० ते ४५ वर्षे जुन्या आणि अत्यंत धोकादायक इमारती आहेत. अनेक नागरिक या इमारतींची दुरुस्ती करू शकत नाहीत किंवा त्यांना क्लस्टर अंतर्गत मंजुरी व परवानगी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने यावर तत्काळ कठोर निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांचा जीव वाचू शकेल आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा किंवा दुरुस्तीचा प्रश्न सुटू शकेल. तसेच, या दुर्घटनेत मयत झालेल्या मुलीच्या वारसांना दहा लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अशीही मागणी केली.
गटनेते अभिजीत पवार यांनी, ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत ढिसाळ असून, महापालिका नागरिकांना मूलभूत सुख-सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. शहरातील अनेक जुन्या व धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असून, यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचे पुनःर्वसन करणे आवश्यक आहे, परंतु प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कठोर निर्णय घ्यावा आणि नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी केली.
ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगर पालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवले जाते. ही बाब अत्यंत चुकीची आहे. पावसाळ्याआधी फक्त धोकादायक-अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते. त्यापेक्षा म्हाडा, नगरविकास, एसआरएकडून ज्या सदनिका या अतिधोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांना द्याव्यात, अशी मागणी केली. तर, यासीन कुरेशी यांनी लकी कंपाउंड दुर्घटनेनंतरही आपण धडा घेतलेला नाही. धोरणेच आखलेली नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600