जिल्हा
ठाण्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैव
ठाण्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैव
फोटो: ठाणे वैभव
* माजी खासदार राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका
* ठाकरे गटाने घेतली पालिका आयुक्तांची भेट
ठाणे: काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्रांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैवी असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने आज महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले.
ठाणेकरांना गेल्या तीन वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पाण्याची बोंबाबोंब आहे, रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहेत, डंपिंग ग्राउंड नाही, कामे न करता बिले काढली जात आहेत, बेकायदा बांधकामे उभी राहत असून यामध्ये प्रशासनातले अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका विचारे यांनी केली. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी याकडे तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी विचारे यांनी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाढवे, समन्वयक संजय तरे, उप शहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, प्रदीप वाघ, प्रशांत सातपुते, लहू सावंत, संजय भोई, विनोद यादव, राजेंद्र महाडिक, अमोल हिंगे, रामेश्वर बचाटे, पप्पू आठवाल, नटेश पाटील, सुनंदा देशपांडे, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, शोभा गरंडे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाण्यात गुन्हेगारी फोफावली
शहरात खून, दरोडे, चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या टेंभीनाक्याजवळील चरई भागात एका रात्रीत तब्बल १४ दुकाने चोरांनी फोडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी असून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सिक्युरिटी दिली जात आहे तर ठाण्यात गुन्हेगारी फोफावली आहे, असा आरोप करत श्री.विचारे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत चर्चा केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600