महाराष्ट्र
कल्याण: ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज
डोंबिवली : साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरकेर यांनी ३० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला होता. यातच आता कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज आज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गट उमेदवार बदलणार का? यासंदर्भाने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
कल्याण लोकसभेत ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी वाजत-गाजत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. दऱेकर या अधिकृत उमेदवार असताना शुक्रवारी दुपारी रमेश जाधव यांनी देखील अर्ज दाखल केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. दरेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज होते. नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून नवी खेळी खेळली गेली आहे का? तसेच ठाकरे गट उमेदवार बदलणार का? की तोच ठेवणार अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
वैशाली दरेकर यांनी सांगितले की, पक्ष त्यांचे उमेदवार ठरवत असतात. पक्ष आदेश देऊ शकतो. आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शिवसैनिकांना तुम्ही फॉर्म भरा सांगणे हा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरा, असे आदेश दिले असतील. प्रत्येक पक्ष दोन दोन फॉर्म भरून ठेवतात. मी मिरवणूक काढून फॉर्म भरला. सगळे लोक हजर होते. त्यामुळे त्यात काहीही वावगे नाही. पक्षाने आदेश दिल्यानंतर रमेश जाधव यांनी अर्ज भरला. त्यामुळे उमेदवार ऐनवेळी बदलणार, असे अजिबात होणार नाही, असे वैशाली दरेकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600