जिल्हा
ठाण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
ठाण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : सार्वजनिक कंपन्या आणि उपक्रमांचे खासगीकरण, चार नव्या कामगार संहिता केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंद पुकारला होता. या भारत बंदला ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सरकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा थेट परिणाम सरकारी कामकाजावर झाला.
सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक सेवांचे खासगीकरण थांबवावे, चार कामगार संहिता रद्द करावी, किमान वेतनाची हमी, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, कंत्राटीकरणावर बंदी, कायमस्वरुपी नोकऱ्यांसाठी आग्रह, आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत सरकारी गुंतवणूकीत वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंद पुकारला होता. राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या माध्यमातून महावितरण कंपनीतील १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. त्यांनी वागळे इस्टेट येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महावितरणच्या ठाणे परिमंडळातील भांडुप, मुलुंड आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा दावा संघटनेने केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600