महाराष्ट्र
विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या - सहस्रबुद्धे
ठाणे : ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव ‘श्रीस्थानक’ हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे, अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केल्या आहेत.
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक महत्वाच्या मागण्याही केल्या. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे-वसई या लोकल सेवा सुरु कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल-एक्सप्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा, तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वच्छतागृहांसह सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने केल्या.
या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ तसेच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्राता कोळी इत्यादींसह नीलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600