महाराष्ट्र
वाहन चालकांकडून पोलिसांना मारहाण, ४० वाहनचालक ताब्यात
ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण
नवी मुंबई: ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदला उल्वे येथे हिंसक वळण लागले असून ट्रक चालकांनी पोलिसांना मारहाण केली आहे. या प्रकरणी ४० वाहन चालकांना अटक करून त्यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंडदेखील आकारला जाणार आहे. कायद्याला विरोध म्हणून सोमवारपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच ट्रकचालक संपावर गेले असून हा संप तीन दिवसांचा आहे. याच बंदला पाठिंबा देण्यासाठी उलवे परिसरात अंबुजा सिमेंटजवळ जेएनपीटी मार्गावर वाहन चालकांनी आंदोलन करीत रस्ता बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हा रस्ता करण्यास गेलेल्या व बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचऱ्यांना यावेळी ४० ते ५० आंदोलक वाहन चालकांनी मारहाण केली. यावेळी एनआरआय पोलिसांनी ४० वाहन चालकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कळंबोली येथे देखील वाहन चालकांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केल्याने कळंबोलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600