जिल्हा
‘रिलायन्स फाउंडेशनने दिले ५१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना स्कॉलरशिप’चे पंख
‘रिलायन्स फाउंडेशनने दिले ५१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना स्कॉलरशिप’चे पंख
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रिलायन्स फाउंडेशनची वार्षिक शिष्यवृत्ती पुन्हा एकदा जाहीर झाली असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ५१०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी केवळ नियमित प्रथम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ४ ऑक्टोबर २०२५
* नियमित प्रथम वर्षातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी अर्ज करू शकतात
* पदवी विद्यार्थ्यांना २ लाखांपर्यंत तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ६ लाखांपर्यंत अनुदान
* शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक स्थितीवर आधारित निवड
२०२२ साली रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त १० वर्षांत ५० हजार शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली होती. त्याच परंपरेत या वर्षी पाच हजार पदवी विद्यार्थ्यांना व १०० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सहा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
पदव्युत्तर शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान या निवडक क्षेत्रांतील भारतातील सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांना दिली जाईल. यामधून राष्ट्रीय विकास आणि जागतिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनास प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश भविष्यकालीन नेतृत्व घडवणे असून अशी पिढी तयार करणे आहे जी समाजाभिमुख, पर्यावरणपूरक आणि डिजिटल विचारसरणीची असेल.
गेल्या २९ वर्षांपासून रिलायन्स फाऊंडेशन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असून आजवर २८,००० हून अधिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून लाभ मिळाला आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार या शिष्यवृत्तीमुळे लाभार्थी अनेक विद्यार्थी आज व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत.
शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी scholarships.reliancefoundation.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600