महाराष्ट्र
पाण्याच्या उधळपट्टीवर निर्बंध
ठाणे : राज्यात धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, पाणी काटकसरीने वापरा रस्त्यावरील वाहने पिण्याच्या अथवा बोरींगच्या पाण्याने धुवू नका, असे आदेश ठाणे महापालिकेने दिले आहेत.
शहरात पाण्याने वाहन आजही चकाचक केली जात आहेत. महिना नाममात्र दराने वाहने धुऊन मिळतात. सार्वजनिक नळ अथवा जुन्या बंद इमारती आदी ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होत असल्याने गाडी धुऊन देणाऱ्यांची वर्षभर चंगळ असते.
महाराष्ट्रातील जलाशयात २८ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर वाहने अथवा वॉशिंग गॅरेज मध्ये वाहने धुण्यास सक्त मनाई केली आहे.
वॉशिंग सेंटरमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहने धुण्यासाठी एका वेळेसाठी जितके पैसे मोजावे लागतात, याच पैशात महिन्यात गाडी धुऊन देणारे अनेक आहेत. दुचाकीसाठी १५० ते २०० तर कारसाठी ५०० ते ६०० रुपयात महिनाभर गाडी धुऊन दिली जाते. जुन्या इमारती अथवा सार्वजनिक नळावर पाणी फुकट मिळते. आणि याचाच उपयोग करून वाहने चकाचक केली जातात. वाहने स्वस्तात स्वच्छ करून मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील वाहने धुतली जात आहेत.
शहरातील अनेक गृहसंकुल आणि रस्त्यावर वाहने राजरोस धुतली जातात. पालिकेने वाहने धुवू नका असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाचे पालन होत नाही. यासाठी पालिकेने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक नितीन देशपांडे म्हणाले.
ठाणे शहराला दर दिवसाला ५८५ एमएलडी पाणी पुरवठा होतो आहे. मात्र एवढा पुरवठा होऊन देखील अनेक सोसायट्यांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. तर दुसरीकडे रोजच्या वापरातील पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600