जिल्हा
वाढलेल्या भाड्याबाबत विचारले म्हणून रिक्षा प्रवाशाला मारहाण
डोंबिवली : शहरात रिक्षा चालकांची दादागिरी वाढली असून वाढीव रिक्षा भाड्याबाबत जाब विचारला असता रिक्षाचालकाने प्रवाशाला बांबूने मारल्याची घटना पूर्वेकडील इंदिरा चौकात झाली. या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
रिक्षा प्रवासी गणेश तांबे हे सोमवारी रात्री ११ वाजता घराकडे जात होते. कल्याणला राहणाऱ्या गणेश तांबे यांनी इंदिरा चौकात जाऊन टाटा पॉवरपर्यंत शेअर रिक्षेने जाण्याचे ठरविले. रिक्षेपर्यंत गेल्यानंतर भाडे किती घेणार असा प्रश्न रिक्षा चालकाला त्यांनी विचारला. यावेळी रिक्षा चालकाने वाढवून भाडे सांगितल्याने त्यांनी इतके भाडे होत नाही असे रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही चिडलेल्या रिक्षा चालकांनी त्यांना रिक्षेतील बांबू काढून मारल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तांबे जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. रिक्षाचालकांची अशी वाढती गुंडगिरी डोंबिवलीकरांसाठी चिंता वाढवणारी आहे.
शहरात महिला प्रवाशांना रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केल्याची घटना याआधी घडली होती. मात्र तरीही वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांचे कोणतेही नियंत्रण रिक्षा चालकांवर नसल्याचे यामुळे समोर येत आहे. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600