जिल्हा
शहापूर-मुरबाड महामार्ग आठ वर्षे रखडला
शहापूर-मुरबाड महामार्ग आठ वर्षे रखडला
फोटो: ठाणे वैभव
एमएसआरडीसीचे अक्षम्य दुर्लक्ष
शहापूर: शहापूर-मुरबाड-पाटगाव- खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहनचालक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. तब्बल आठ वर्षांपासून शहापूर-मुरबाड पट्ट्यातील काम पूर्णत्वास न गेल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, निकृष्ट दर्जाची दुरुस्ती आणि नियमबाह्य स्पीडब्रेकर यामुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. या संपूर्ण मार्गाकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान घोरपडी नदीच्या पुलाजवळील धोकादायक वळणावर पडलेले खड्डे वाहनचालकांना वेळेत दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे.त खुटघर, नडगाव या ठिकाणी अवजड वाहने कधीही पलटी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मार्गावर अनेक ठिकाणी कोणतेही अधिकृत फलक, पांढरे पट्टे किंवा सूचना नसलेले गतिरोधक उभारण्यात आल्याने दुचाकी आणि चारचाकी चालकांना अचानक ब्रेक मारावे लागत आहेत. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात घडत असून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्ता कधी पूर्ण होईल याची खात्री नाही; पण निदान अर्धवट रस्त्यावरील खड्डे व नियमबाह्य स्पीडब्रेकर तरी हटवा,अशी मागणी जोर धरू लागली आहे. महामार्गावर सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्यापूर्वी एमएसआरडीसीने तातडीने महामार्गावरील खड्डे बुजवून नियमबाह्य स्पीडब्रेकर हटवावेत, तसेच रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी एकमुखी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600