जिल्हा
पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठास रौप्य
पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठास रौप्य
फोटो: ठाणे वैभव
संघातील सातही खेळाडू ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी
ठाणे: जयपूर येथे भव्य उत्साहात पार पडलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने रौप्यपदक पटकावले.
देशातील १६ विद्यापीठांतील ११२ सर्वोत्तम खेळाडूंनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात क्रिश देसाई, अथर्व जोशी, अभ्युदय चौधरी, इयान लोपेज, सारांश गजबिये, सिद्धार्थ दास आणि झाको सेयीये हे सर्व सातही खेळाडू ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी होते.
मुंबई विद्यापीठाने स्पर्धेची सुरुवात मणिपूर विद्यापीठावर ३-० असा एकतर्फी विजय मिळवत केली. त्यानंतर एसआरएम विद्यापीठ, आंध्र प्रदेशवर ३-२ असा कणखर विजय नोंदवून संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. उपांत्य फेरीत महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम (केरळ) यांचा ३-० असा धुव्वा उडवत संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत मात्र चितकारा विद्यापीठ, पंजाबविरुद्ध कठीण लढाई देत मुंबई विद्यापीठाला पराभव स्विकारावा लागला.
या शानदार मोहिमेत क्रिश देसाईचे प्रदर्शन उल्लेखनीय ठरले. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात त्याने अत्यंत स्थिर शैलीत खेळ करत सलाम स्टीअर्ली सिंगला २१-११, २१-१६ असे सरळ गेममध्ये हरवले. त्याच लढतीतील दुहेरी सामन्यातही क्रिशने इयान लोपेजसोबत खेळताना जलद गती, कोर्ट कव्हरिंग आणि अचूक शॉट्सद्वारे प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व ठेवले. एसआरएम विद्यापीठाविरुद्धच्या सामन्यातही त्याने संघर्षपूर्ण परंतु प्रभावी कामगिरी करत १७-२१, १८-२१ असा निकाल संघाच्या बाजूने खेचला. उपांत्य फेरीत महात्मा गांधी विद्यापीठाविरुद्ध क्रिशने पुन्हा एकदा आपली दमदार छाप सोडत अभिषेक संतोष कुमारवर निर्णायक विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत क्रिशने दाखवलेले मनस्वी निर्धार, फिटनेस आणि स्ट्रोक प्ले हे संघाच्या यशातील मुख्य आधारस्तंभ ठरले.
अथर्व जोशीनेही शांत पण अत्यंत प्रभावी कामगिरीची छाप पाडली. एसआरएम विद्यापीठाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने अनुपोजू चारण गणेशवर १९-२१, १८-२१ असा सुबक विजय मिळवला. नेटवरील नियंत्रण, रॅलीमधील संतुलन आणि खेळातील सातत्य या गुणांमुळे अथर्वने संघाच्या विजयात मोलाची भर घातली.
या संघात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे इतर प्रशिक्षणार्थी अभ्युदय चौधरी, इयान लोपेज, सारांश गजबिये, सिद्धार्थ दास आणि झाको सेयीये यांचीदेखील उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली.
अकॅडमीचे संचालक, दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कारप्राप्त श्रीकांत वाड सर म्हणाले, क्रिश देसाई आणि अथर्व जोशी यांची कामगिरी ही केवळ त्यांच्या मेहनतीचा नव्हे, तर त्यांच्या सातत्यपूर्ण शिस्तीचा पुरावा आहे.
छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मयूर घाटणेकर, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर, तसेच प्रशिक्षक मितेश हाजिरनीस आणि राजीव गणपुले यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा आणि विश्लेषणाधारित कोचिंगचा ठसा संपूर्ण संघाच्या कामगिरीत प्रकर्षाने दिसून आला.
संघ व्यवस्थापक सुशांत दिवेकर (आनंद विश्व गुरुकुल, ठाणे) यांनी संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व, नियोजन, मार्गदर्शन आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600