महाराष्ट्र
मान्सूनची ठाण्यात दमदार हजेरी
ठाणे: मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस तुरळक सरी बरसत आहेत. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तासातच ठामपा हद्दीत १६ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत पावसाची ३७.०६ मिमि पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. शनिवारी पहाटे पावसाने लावलेल्या हजेरीत २५.०५ मिमिची नोंद झाली. त्यानंतर दिवसभर गायब असलेला वरुणराजा रात्री जागा झाला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अवघ्या तासाभरात १६.७६ मिमि इतकी पावसाची नोंद झाली. त्यांनतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. साडेपाचपर्यंत ठाण्यात सुमारे १५ मिमि पावसाची नोंद झाली. त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या सात तासांमध्ये एकूण ३७.०६ अशी पावसाची नोेंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांच्या पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत ६२.११ मिमि पावसाची नोंद झाली आहे.
ठाण्यात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र झाडे कोसळण्याचे सत्र सुरुच होते. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चरई, धोबीआळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडले. शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना मुंब्रा येथील नुरीबाबा दर्गाजवळ झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान झाले.
ठाणे- ३३.३ मिमी, कल्याण- २० मिमी, मुरबाड-१.६ मिमी, भिवंडी-२०.३ मिमी, शहापूर-१४.६ मिमी, उल्हासनगर-१२ मिमी, अंबरनाथ-४.८ मिमी,
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600