महाराष्ट्र
जिल्ह्यातील जलतरणपटू गेले पाल्क सामुद्रधुनी पोहून
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नऊ ते १८ वयोगटातील 12 तरुण जलतरणपटूंनी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) हे 23 किलोमीटर सागरी अंतर 10 तास 10 मिनिटामध्ये यशस्विरित्या पोहून इतिहास घडविला.
ही आंतरराष्ट्रीय मोहीम यशस्वी करणारा ठाणे ज़िल्ह्यातील हा पहिला संघ आहे. अर्णव पाटील (9), स्वरा हंजणकर (11), अभिर साळसकर (11), वंशिका अय्यर (12), शार्दुल सोनटक्के (13), रुद्र शिराळी (13), अपूर्व पवार (15), अथर्व पवार (15), सविओला मस्करेन्हास (16), स्वरा सावंत (17), लौकिक पेडणेकर (18) आणि मीत गुप्ते (18) या १२ भारतीय जलतरणपटूंनी 4 मे 2024 रोजी पहाटे श्रीलंकेच्या तलाईमन्नार येथून पोहण्यासाठी सुरुवात करून धनुषकोडी, भारत येथे दुपारी यशस्वीरित्या पार पाडले.
हवामान अतिशय प्रतिकूल होते व वाऱ्याचा वेग ताशी ३० कि.मी होता. समुद्रात लाटांची उंची 1.1 मीटर असून दिशा दक्षिण पश्चिमेकडे होती, जी पोहण्यासाठी पूर्णपणे प्रतिकूल होती. संपूर्ण हवामान खूप वादळी होते. जलतरणपटूंनी या प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वीपणे सामना केला आणि रिले पॅटर्नमध्ये 10 तास 10 मिनिटांत हे अंतर पोहून पूर्ण केले. 9 ते 18 वर्षे वयोगटातील 12 तरुण जलतरणपटूंमध्ये धैर्य, इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि दृढनिश्चय यांचे परिपूर्ण प्रात्यक्षिक दिसून आले.
या संघाला रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव, ठाणे येथे मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार यांनी प्रशिक्षण दिले तर पोहण्याच्या प्रशिक्षणाला भारती सावंत यांचेही सहकार्य लाभले. या प्रकल्पाच्या इनचार्ज आरती प्रधान, माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व क्रीडा मार्गदर्शक होत्या.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600