जिल्हा
ठाणे-बदलापूरला हुडहुडी
बदलापूर : हवेत गारठा वाढू लागला असून आजचा शुक्रवार हा यंदाच्या हंगामातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. शुक्रवारी बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.
सकाळच्या सुमारास बदलापुरात ११.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्या खालोखाल अंबरनाथ, उल्हासनगर शहरातही सरासरी १२ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे शुक्रवार हा थंड दिवस ठरला आहे.
गेले काही दिवसात राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये कमी तापमानाची नोंद होते आहे. रात्री निरभ्र आकाश असल्याने तापमानात घट होते आहे. त्यात दिवसा ईशान्येकडून येणारी कोरडी हवी आणि आर्द्रता घटल्याने तापमानात घट होते आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट नोंदवली जाते आहे. बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी शुक्रवारी आपल्या हवामान केंद्रात बदलापुरात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद केली.
शुक्रवारी बदलापुरातील तापमान ११.९ अंश सेल्सिअस इतके होते. हे हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार २९, ३० नोव्हेंबर थंड दिवस असणार आहेत. त्याप्रमाणे तापमान नोंदवले गेले अशी माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे. बदलापूरप्रमाणे अंबरनाथ शहरातही १२.९अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शेजारच्या उल्हासनगर शहरात १३.२, कल्याणमध्ये १३.५, पलावा येथे १३.६, पनवेल येथे १३.७, डोंबिवली येथे १४.२, नवी मुंबई येथे १५.३, तर ठाणे शहरात १५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारी सकाळी करण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही अंशी थंडी कमी असेल अशी माहिती मोडक यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600