महाराष्ट्र
ठाणे पूर्वेतील उड्डाणपुल १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार
ठाणे : ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या, स्टेशन परिसर विकास सुधारणा योजने अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली.
स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण २.२१ किमी अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम तसेच, कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे.
आयुक्त राव यांनी कन्हयानगर येथे या संपूर्ण प्रकल्पाचे आरेखन समजून घेतले. त्यातील, रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर, उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच, स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर, आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, अंफी थिएटर यांना भेट दिली. नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सभोवतालचा परिसर येथील बांधकामाच्या स्थितीचीही आयुक्तांनी पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामे, प्रकल्पबाधित कुटुंबाचे स्थलांतर यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600