महाराष्ट्र
राज्यातील कांदा खातोय भाव, पन्नाशी केली पार
नवी मुंबई: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा-बटाटा बाजारात परराज्यातील कांद्याची आवक रोडावली आहे. त्यामुळे राज्यातील कांदा सध्या भलताच भाव खात असून घाऊक बाजारात कांदा २५ ते ५२ रुपये किलोने विकला जात आहे. तर किरकोळीत ४० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे.
वाशीतील कांदा-बटाटा बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकसह राज्यातील नाशिक, सातारा, सोलापूर कोल्हापूर आदी भागातून नित्याने कांद्याची आवक होत असते. मात्र गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने तेथील आवक पूर्ण ठप्प झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कांदा उत्पादनाला आताच सुरुवात झाली असल्याने बाजारात सध्या कांद्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे बहुतांश साठवणूकदारांनी आपला कांदा बाहेर काढला असल्याने कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
एपीएमसी घाऊक बाजारात सध्या ९० ते ९५ गाड्या कांदा आवक होत असून किमान २५ ते कमाल ५२ रुपये किलोला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात हाच कांदा ४० ते ८० रुपयांनी विकला जात आहे. बाजारात सध्या नाशिक आणि सातारामधून कांदा आवक होत आहे. कर्नाटकमधील हुबळी, धारवाड, बंगलोर आणि राज्यातील सोलापूरमध्ये कांदा काढणीला आला आहे. मात्र या परिसरात पाऊस नाही पडला तर उत्पादन चांगले निघणार असून दर आवाक्यात येतील. पावसाचा जोर वाढला आणि पीक खराब झाले तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600