महाराष्ट्र
रो-रो सेवेमुळे भाईंदर-वसई प्रवास होणार १० मिनिटांचा
रो-रो सेवा तत्काळ सुरू करा-खा.विचारे
ठाणे : भाईंदर आणि वसई जेट्टीचे काम पूर्ण झाले असून रस्ते वाहतुकीचा दीड तासांचा प्रवास रो रो सेवेमुळे १० मिनिटांचा होणार आहे. त्यामुळे ही सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे.
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई जलवाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती.
सन २०१६ ला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत भाईंदर-वसई जलवाहतुकीला मंजुरी मिळाली. परंतु पर्यावरण आणि पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने हे काम सुरु करण्यास विलंब लागत होता. खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या. सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले व त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून घेतले. शनिवार ३ फेब्रुवारी २०२४ रोजी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर आणि वसई या दोन्ही जेट्टीची पाहणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या दोन्ही जेट्टींची कामे पूर्ण झाल्याने खासदार राजन विचारे यांनी तत्काळ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा-भाईंदरवासींसाठी भाईंदर-वसई जेट्टीवरून तात्काळ रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा दीड तासाचा वाहतूक कोंडीचा प्रवास रो-रो जलमार्गे दहा मिनिटांचा होणार आहे. हा सुखकर मार्ग लवकर सुरु करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
डोंगरी चौक ते वसई रो रो सेवा
भाईंदर उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांना वसई येथे जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असतो. त्यासाठी त्यांचा अतिरिक्त वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. ठाणे जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय सुद्धा पालघरला असल्याने बोटीचे लायसन्स आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार त्यांना वसई, पालघरला जावे लागते. यासाठी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे डोंगरी चौक ते समोर दिसणारी वसई जेट्टीवर रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाईंदर येथील जैसल पार्क जेट्टीवरून घोडबंदर मार्गावरील फाउंटन हॉटेलजवळील तयार झालेल्या जेट्टीचा वापर प्रवासी बोट सुरू करून जलवाहतुकीसाठी करावा जेणेकरून पर्यटकांनाही चालना मिळेल. तसेच सहा महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतील पहिल्या टप्प्यात डोंबिवली, कोलशेत, मीरा-भाईंदर, काल्हेर या जेटींची कामे सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600