जिल्हा
आटगावजवळ भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू
आटगावजवळ भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगावजवळ बुधवारी पहाटे भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दीप भेरे (१८) आणि हर्षल कांबळे (१९) अशी मृत तरुणांची नावे असून ते दुचाकी (क्रमांक एम एच ०४ एम एक्स ९५३०) वरून प्रवास करत होते.
प्राथमिक माहितीनुसार आटगाव परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिक आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच शहापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघेही लहानपणापासून जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. एकत्र जगले आणि शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही, अशा भावना नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल केली असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी चालकाला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600