जिल्हा
आंबा पिकवण्यासाठी रसायनाचा वापर; तीन व्यापाऱ्यांवर कारवाई
७५ हजार रुपयांचे १४६ डझन आंबे जप्त
नवी मुंबई: झटपट आंबा पिकवण्यासाठी काही व्यापारी आंब्यावर थेट रसायनाचा मारा करतात. अशा अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली असून त्यांच्याकडून ७५,५०० किंमतीचे १४६ डझन आंबे अन्न औषध प्रशासनाने जप्त केले.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी कॅल्शियम कार्बोईडचा वापर करून फळे पिकविणाऱ्यांवर बंदी घातलेली आहे. कॅल्शियम कार्बाइड या रसायनामधून ऍसिटिलीन हा वायू उत्सर्जित होतो, त्यामुळे फळे पिकतात. त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. या रसायनाच्या वापरावर बंदी आहे. परंतु इथिलिन वायूचा विहित पद्धतीने वापर करून फळे पिकविण्यासाठी मान्यता आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यानुसार इथिलिन गॅस सिलिंडर, कॉम्प्रेस्ड इथिलिन गॅस, इथिलिन गॅस उत्सर्जित करणारी रसायने व इथेफॉम सॅचेट हे विहित पद्धतीने वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. इथिलिन गॅस उत्सर्जित करणाऱ्या रसायनांना जरी मान्यता दिली असली तरी त्या रसायनांच्या द्रावणाचा थेट फळांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
असे नियम असताना देखील वाशीतील एपीएमसी फळ बाजारात इथेफॉम पाण्यात मिसळून त्याचा थेट मारा आंब्यावर करत होते. अशा तक्रारी अन्न औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच अशा प्रकारे रसायनाचा थेट मारा करत असल्याच्या काही चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्या होत्या. याची दखल घेत अन्न-औषध प्रशासन पथकाने सोमवारी टाकलेल्या धाडीत तीन व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत इथलेन-इथेफॉन या इथिलिन गॅस उत्सर्जित करणाऱ्या रसायनांचे द्रावण थेट आंबा या फळावर स्प्रे केल्याच्या संशयावरून सदर फळांचे नमुने घेऊन उर्वरित १४६ डझन किंमत रु. ७५,५०० चा साठा अन्न औषध प्रशासनाकडून जप्त केला असून नमुने तपासणीसाठी दिले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600