जिल्हा
कसाऱ्याजवळ खासगी बसच्या अपघातात १५ प्रवासी जखमी
कसाऱ्याजवळ खासगी बसच्या अपघातात १५ प्रवासी जखमी
फोटो: ठाणे वैभव
शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील चिंतामण वाडीजवळ मुंबईहून सिन्नरला जाणाऱ्या टुरिस्ट बस (क्रमांक एम एच 46 बी बी 2185) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एका वळणावर अपघात होऊन त्यात १५ हून अधिक जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गभीर आहे.
मुंबई येथून नाशिक येथे लग्नाकरीता जात असताना चिंतामण वाडी येथील वळणावर टुरिस्ट बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस एका नाल्यात पलटी झाली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गुरुनाथ वाताडे, बाळू मांगे, कैलास गतिर, फय्याज शेख, स्वप्नील कलंत्री, अक्षय लाडके यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत कसारा पोलीस आणि शहापूर महामार्ग पोलीस यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर जे जे रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, महामार्ग पोलीस अधिकारी छाया कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी करून क्रेन आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
जखमींमध्ये भावेश राजगुरू (२२), प्रतिभा सोनवणे (२५), मारुती सोनवणे (५०), अशोक भालेराव (४५), मेघा पालचंद (२५), बळीराम आढाळे (५१), वंश भालेराव (१०), राहुल सोनवणे (२५), रंजना सोनवणे (५०), रुबीना शेख (२९), मंगल राजगुरू (२५), सुकेशीनी राजगुरू (२३), नकुशा राजगुरू (३८), स्वाती राजगुरू (२०), राहुल करकर (२२) यांचा समावेश असून यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600