जिल्हा
ठाण्यात पहिल्या टप्प्यातील ६० टक्के रस्त्याची कामे पूर्ण
ठाणे: ठाण्यातील पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे ही ६० टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून २१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या कामांमध्ये उड्डाणपुलांवरील मास्टिक कामांचा समावेश आहे. तर ६० टक्के पूर्ण झालेल्या कामांमध्ये डी मार्ट ते कासारवडवली तसेच दिवा आणि वागळेमधील काही अंतर्गत रस्त्यांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या टप्यातील ३९१ कोटींच्या कामांना फारशी गती मिळाली नसली तरी, दोन्ही टप्प्यातील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे महापालिकेने युध्द पातळीवर हाती घेतली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१४ कोटींची १२७ रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. त्यातील बहुतेक कामे आता टप्प्यात आली असून ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दुसऱ्या टप्यात आलेल्या ३९१ कोटींच्या माध्यमातून महापालिकेने पुन्हा १५७ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे २५ टक्केच पूर्ण झाली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. सिमेंट, युटीडब्युटी आणि डांबरी अशा पध्दतीने रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामांना डिसेंबर २०२२ पासून सुरुवात करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांना फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यातील निधी ठाणे महापालिकेला प्राप्त झाला असून अद्याप बिल देण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेकडून सुरु करण्यात आलेली नाही. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे कामांचा दर्जा बघूनच बिले अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडू स्पष्ट करण्यात आले आहे.
एकाच वेळेस शहरातील कळवा, मुंब्रा, दिवा, ठाणे शहरातील मध्यवर्ती भाग, वर्तकनगर, लोकमान्य नगर, घोडबंदर भाग आदींसह इतर सर्वच ठिकाणी रस्त्यांची कामे केली जात असल्याने दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600