जिल्हा
आवक घटल्याने बाजारात कोथिंबिर कडाडली
आवक घटल्याने बाजारात कोथिंबिर कडाडली
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मागील आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे कोथिंबीर पिकाचे नुकसान झाल्याने कोथिंबीरचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात आवक कमी झाली असून, घाऊक बाजारात एक ते सव्वा किलोच्या जुडीला तब्बल २०० ते २५० रुपये दर मिळत आहे.
बंगलोरमधील लहान जुडीसाठी ग्राहकांना ५० ते ६० रुपये मोजावे लागत असून, ही महागाई किमान पुढील १५ दिवस कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात मागील आठवड्यात काही भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा, तर काही ठिकाणी वाढलेल्या उष्णतेचा फटका पालेभाज्यांच्या उत्पादनाला बसला आहे. परिणामी वाशी एपीएमसी बाजारात कोथिंबिरीची आवक सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांना सहन करावा लागत आहे. वाशी एपीएमसी बाजारात कोथिंबीर प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि मंचर परिसरातून दाखल होते. मात्र नाशिक भागातील ९० आवक घटली असून पुणे मंचर येथील आवक कमी आहे. त्यामुळे बाजारातील मागणी भरून काढण्यासाठी बंगळुरूहून कोथिंबीर मागविण्यात येत असली, तरी तेथूनही मर्यादित प्रमाणातच माल उपलब्ध होत असल्याने बाजाराला अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. यापूर्वी घाऊक बाजारात एक ते सव्वा किलोची जुडी अवघ्या २० ते ३० रुपयांना विकली जात होती. आता त्याच जुडीसाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत. तर बंगळूरमधील एका लहान जुडीला ५० ते६० रुपये दर मिळत असून दरात जवळपास दहापट वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला आहे. गृहिणींच्या स्वयंपाकाच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे.
एपीएमसीमधील भाजी विक्रेते इम्रान शेख यांनी सांगितले की, नाशिक, पुणे आणि मंचर येथील उत्पादन घटल्यामुळे बाजारातील आवक सुमारे ४० ते५० टक्क्यांनी कमी झाली आहे. बंगळुरूहून माल मागवूनही पुरवठा मर्यादित असल्याने परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे पुढील १५ दिवस कोथिंबिरीसह इतर पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600