जिल्हा
इंधन टंचाईची झळ न्यायालयीन कामकाजालाही
अंबरनाथ: आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईची झळ अन्य उद्योग, व्यवसायाप्रमाणे न्यायालयीन कामकाजालाही बसू लागली आहे.
इंधन टंचाईमुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे वकील अथवा पक्षकार न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांच्या विरोधात कोणतेही विपरीत आदेश पारित करू नयेत, अशी मागणी करून चिखलोली वकील संघटनेने न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
राज्यात इंधन टंचाईचे सावट आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून, इंधनाचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या परिस्थितीचा फटका आता न्यायालयीन कामकाजालाही बसू लागला असून, चिखलोली-अंबरनाथ येथील वकील संघटनेने इंधन टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी ही मागणी केली आहे.
अंबरनाथ शहरात नव्याने चिखलोली-अंबरनाथ तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालय कार्यान्वित झाले आहे. कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाका आणि अंबरनाथ काटई रस्त्यावरील जोड रस्त्यावर हे न्यायालय आहे. त्यामुळे उल्हासनगर, कल्याणमध्ये जाणाऱ्या अशील, वकील, पोलिस आणि फिर्यादींच्या नातेवाईकांचा वेळ वाचतो आहे. मात्र इंधच टंचाईचा आता न्यायालयीन कामकाजालाही फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर येथील चिखलोली-अंबरनाथ तालुका दिवाणी व फौजदारी वकील संघटनेने मुख्य न्यायाधीशांना विनंती पत्र दिले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600