महाराष्ट्र
'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक
अन्यथा शाळांवर कारवाई होणार
मुंबई : मराठी शाळेसोबतच आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतच आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे. पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.
उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी शालेय शिक्षण विभाग घेणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची जी काही तपासणी व्हायची ती औपचारिकरित्या व्हायची. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
भंडारा येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600