जिल्हा
गुरुवारी ठाण्यातील काही भागात २४ तास पाणी नाही
गुरुवारी ठाण्यातील काही भागात २४ तास पाणी नाही
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जलसंपदा विभाग आणि ठामपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनुसार सद्यस्थितीत आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची तूट तसेच पुढील हंगामात पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत पाणी कपात करण्याचे प्रस्तावित आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरूत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार २१ मे रोजी दुपारी १२पासून शुक्रवार २२ मे रोजी दुपारी १२ पर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600