जिल्हा
डाळींबाचे उत्पादन घसरल्याने दर चढले
नवी मुंबई: राज्यात पावसाने ओढ दिल्याने डाळींब उत्पादन घटले आहे. त्यामुळे वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती फळ बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे.
वाशीतील कृषी उत्पन्न समितीच्या घाऊक बाजारात प्रतिकिलो ७०-१०० रुपयांनी वाढ झाली असून १००-२५० रुपयांनी विक्री होत आहे. पावसाळ्यात पपई, सफरचंद, सीताफळ, पेर या फळांचा हंगाम सुरू होतो. त्याचबरोबर डाळींबही दाखल होण्यास सुरुवात होते.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुलैअखेर डाळिंबाच्या हंगामाला सुरुवात होते. ऑगस्ट महिन्यात आवक वाढण्यास सुरुवात होते. त्यांनतर बाजारात डाळिंबाचा हंगाम सुरू होतो. राज्यातून सोलापूर, नगर, नाशिक, सांगली, पुणे तसेच गुजरात आणि राजस्थान येथून डाळींब दाखल होतो. पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन हंगामांत डाळिंबाचे पिक घेतले जाते, मात्र मुख्य हंगाम हा पावसाळ्यात असतो. आता ऐन हंगामाला सुरुवात झाली आह. मात्र पुरेसा पाऊस पडत नसल्याने उत्पादन
३५टक्क्यांनी कमी झाले आहे.
सध्या बाजारात राज्यातील ८ ते १० डाळींबाच्या गाड्या दाखल होत आहेत. दिवाळीनंतर गुजरात आणि राज्यस्थान येथील डाळींब दाखल होण्यास सुरुवात होईल मात्र ती ही आवक कमी असेल, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. सध्या बाजारात आवक कमी असून गणेशोत्सव दरम्यान आवक वाढेल मात्र दर आणखीन वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधी घाऊक बाजारात ३०-१५० रुपयांनी उपलब्ध असलेले डाळींब आता १००-२५० रुपये तर किरकोळ बाजारात १५०-२७० रुपयांनी विक्री होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600