जिल्हा
सतत रहदारीत राहिल्यास टिनिटस आजाराचा धोका
कळवा रुग्णालयात महिन्याकाठी १० ते १२ रूग्ण
भालचंद्र देव/ठाणे : सतत रहदारीत राहिल्यास ‘टिनिटस’ हा कानाचा आजार होण्याची दाट शक्यता असते, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि संशोधकांनी काढला आहे. हा आजार झालेले रुग्ण कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या कान, नाक आणि घसा विभागात उपचार करण्यासाठी येतात, अशी माहिती ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अमोल श्रीपाद खाले यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
ईएनटी विभागात येणा-या रुग्णांची संख्या मोठी नसली तरीही, ती महिना 10 ते 12 इतकी आहे, असे त्यांनी सांगितले. या 10 ते 12 जणांची लक्षणे त्यांच्या कामांमध्ये निर्माण होणा-या आवाजांनुसार आणि मुख्यत्वे वयोमानानुसार होतात. अशा रुग्णांवर उपचार करताना ते तणावात असल्याचे जाणवते. काही रुग्णांच्या कानातून घंटी किंवा शिट्टी वाजल्याचा आवाज येतो. सातत्याने वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे किंवा सदोदित रहदारीच्या ठिकाणी राहिल्याने वाहनांच्या हॉर्नचा आवाज मनात घुमत राहतो आणि त्याचा परिणाम म्हणून टिनिटस हा आजार होतो, असे या डॉक्टरांनी आणि संशोधकांनीही सांगितले.
टिनिटस हा कानाचा आजार असला तरी त्याचा संबंध मानसिक आजाराशीही आहे. कानातून घंटी किंवा शिट्टी वाजल्याचा अनुभव येतो किंवा कधीकधी बसल्याबसल्या अचानक कानात जोरात शिट्टी वाजते आणि काही वेळाने सर्वसामान्य होते. या आवाजाचा सुरुवातीला काहीही त्रास होत नसला तरी सातत्याने असे आवाज येत असतील तर पुढे त्याची तीव्रता वाढून गंभार आवाज वाढत असल्याची शक्यता असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे, कानांमधील पेशींची हानी झाल्याने टिनिटसचा आजार होतो, असेही डॉ. खाले यांनी सांगितले.
या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास रुग्ण तणावात जाण्याची भीती असते. रुग्णांमध्ये ऐकण्याच्या आणि झोपेच्याही समस्या येऊ शकतात, असे यावर संशोधन करणा-या वैद्यकीय संशोधकांनी सांगितले. त्यावर उपाय केले तरी ते तात्पुरते असतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मानसिक ताण, झोपेतही अडथळे, तणावग्रस्त होणे आणि निद्रानाश होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
जर तुमचे घर वारंवार रहदारी होणा-या रस्त्याच्या बाजूला असेल तर वाहतुकीच्या सातत्याच्या आवाजामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो आणि तुमच्या झोपेतही अडथळे येऊ शकतात. वाहतुकीच्या आवाजाने तणावग्रस्त होणे आणि निद्रानाश होणे, असे आजार झाल्यास हे ‘टिनिटस’चे लक्षण आहे, असे डॉ. खाले म्हणाले. जितक्या जास्त वेळा रहदारीशी संबंध येतो तितका हा आजार प्रभावी होऊ शकतो असे डॉ. आणि संशोधकांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600