जिल्हा
ठामपाचे दायित्व गेले ३५० कोटींवरून एक हजार कोटींवर!
ठाणे: खर्चावरील बंधने, काटकसर आणि शिस्त अशी त्रिसूत्री वापरल्याने ठाणे महापालिकेचे दायित्व ३५० कोटींवर आले होते. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका लावण्यात आल्याने दायित्वाचा हा भार एक हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे राहिले आहे.
चार वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेवर असलेले दायित्व तब्बल ३४०० कोटींच्या घरात होते. त्यानंतर दायित्वाचा भार २७४२ कोटींपर्यंत येऊन ठेपला होता. मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या तीन वर्षात कमी झाला होता. प्रत्येक वर्षी ६०० ते ७०० कोटींची बिले अदा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखल्यामुळे सप्टेंबर २०२५ पर्यंत हे दायित्व अवघे ३५० कोटींवर आले होते. मात्र ३५० कोटींवर आलेला हा दायित्वाचा भार आता एक हजार कोटींवर गेला आहे.
यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने तातडीने विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे. सध्या महासभा अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवरच विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामांच्या बिलापोटी दायित्वाचा भार पुन्हा वाढला असून हा आर्थिक भार आता एक हजार कोटींवर गेला असल्याने ठाणे महापालिकेचे पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेला २०० कोटींचे बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले आहे. तर ५५८ कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेने केंद्राकडे नव्याने प्रस्ताव पाठवला आहे. हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्याने यामुळे ठाणे महापालिकेला थोडाफार आर्थिक हातभार लागणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600