जिल्हा
ठाण्यात दीड वर्षांत ५६० झाडे कोसळली
ठाण्यात दीड वर्षांत ५६० झाडे कोसळली
फोटो: ठाणे वैभव
पाऊस नसतानाही गेल्या पाच महिन्यांत ५५ झाडे उन्मळली
ठाणे: स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दीड वर्षांत तब्बल ५६० झाडे उन्मळून पडली तर ३८९ फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या पाच महिन्यांत ५५ मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे नागरी विकासकामे, अशास्त्रीय पद्धतीने झालेली खोदकामे आणि झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे आज सिमेंट काँक्रीटच्या जंगलात बदलत चालले आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर घाला पडत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. झाडांची मुळे तुटल्याने त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही मोठी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत आहेत.
महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या (२०२६) जानेवारीत ८, फेब्रुवारीत १४, मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये १२ तर मे महिन्यात आतापर्यंत सहा झाडे कोसळली आहेत. याशिवाय ३९ ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
दरम्यान, काही ठिकाणी इमारती किंवा व्यावसायिक आस्थापनांसमोर अडथळा ठरणारी झाडे जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी त्यांच्या मुळांमध्ये ऍसिड किंवा रासायनिक इंजेक्शन टाकले जात असल्याचाही आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे या सर्व घटनांची सखोल चौकशी करून वृक्षसंवर्धनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरवर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात वाढलेली झाडेच कोसळत असतील, तर ठाण्याची उरलेली हिरवाईही धोक्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600