जिल्हा
बारवी धरणात यंदा २४ टक्के पाणीसाठा कमी
बारवी धरणात यंदा २४ टक्के पाणीसाठा कमी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : आठवडाभर मुसळधार पाऊस पडल्याने ठाणे जिल्हा सुखावला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. धरणात पाण्याची आवक बंद झाल्याने पाणीसाठ्यात पुन्हा घसरण होऊ लागली आहे.
सध्या बारवी धरणात अवघा ४९ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो तब्बल ७३ टक्के होता. त्यामुळे धरणक्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील गेल्या आठवड्यात झालेल्या पावसावर लागवड सुरु केली आहे. जर येत्या काही दिवसात पावसाने पुन्हा जोर नाही पकडला तर शेतकऱ्यांवर देखील दुबार लागवडीचे संकट ओढावू शकते.
बारवी धरणक्षेत्रातही सलग आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे बारवी धरण हे २२ टक्क्यांवरून थेट ४९ टक्क्यांवर आले. यामुळे जर एक आठवडा याच पद्धतीने पाऊस सुरु राहिला असता तर धरण काठोकाठ भरले असते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने धरणातील पाणीसाठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे.
बारवी धरणावर ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथसह लाखो नागरिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धरणक्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांप्रमाणेच सलग आणि जोरदार पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने अशीच दडी मारली तर आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर करावे लागू शकते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मान्सूनच्या पुनरागमनाकडे लागले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600