जिल्हा
मित्राचाच निर्घृण खून; दोन रिक्षाचालक अटकेत
मित्राचाच निर्घृण खून; दोन रिक्षाचालक अटकेत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुंब्र्यात जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केल्यानंतर त्याचे मुंडके धडापासून वेगळे करून दोन्ही हात कापत मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन रिक्षाचालकांना अटक करण्यात आली असून जुन्या वादातून एका मित्राची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी खून करतानाचे चित्रीकरण स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.
अमन शेख (२३) असे मृताचे नाव असून ते मुंब्रा परिसरातील देवरीपाडा परिसरात राहत होते. त्यांचा खून केल्याच्या आरोपाखाली फैज सुलतान मालीम (२४) आणि अल्बान सुलतान मालीम (२३) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे रिक्षाचालक असून ते शिळ-डायघर येथील रहिवासी आहेत. अमन मुस्तकीन शेख यांचा १३ मार्च २०२६ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले होते, दोन्ही हात कापले होते आणि मृतदेहाचे विविध अवयव निर्जनस्थळी टाकून दिले होते. या प्रकरणी सुरुवातीला मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ४ चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत त्यांनी जुन्या वादातून अमन शेखची हत्या केल्याची कबुली दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600